नांदेड – गेल्या दोन दिवसांपासून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचे तांडव सुरुच असून आता एका नवजात बालकासह मातेचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजली वाघमारे (वय 22 वर्ष) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली. महिलेने मुलीला जन्म दिला होता. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर, महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा सुद्धा मृत्यू झाला. शनिवारपासून या महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नसल्याचा आरोप केला जात आहे.
डाॅक्टरांनी बाळ व आई सुखरूप असल्याची दिली होती माहिती –
शनिवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांची प्रस्तुती झाली. त्यानंतर डाॅक्टरांनी बाळ व बाळाची आई सुखरूप असल्याची माहिती दिली. सर्व काही व्यवस्थित असताना शनिवारीच बाळाचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दरम्यान, डाॅक्टरांनी लिहून दिलेली औषधे तातडीने आम्ही खासगी मेडीकलवरून आणून पुरवली. औषधाचा खर्च पन्नास हजाराच्या जवळपास झाला. पण एवढे करूनही आम्हाला अचानक बाळ दगावल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आम्हाला धक्काच बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी व मुलगी गेल्याने अत्यंत दुखी झाल्याची प्रतिक्रिया महिलेचे पत्ती मंचक वाघमारे यांनी दिली आहे. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच आक्रोश केला होता.
दरम्यान, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 48 तासात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये आता आणखी भर पडली आहे. तर औरंगाबाद येथील रुग्णालयात देखील 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर नागपूर येथील दोन शासकीय रुग्णालयात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा चव्हाट्यावर आली आहे. रुग्णालयात औषधे नसल्याने त्यांना बाहेर पाठवले जात असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रानाच व्हेंटीलेटरवर असल्याचे उघड झाले आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळी राज्य सरकारवर ताशेरे ओढत असून सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे.