पुणे, दि. 2 -राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला आग लागल्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सिन्नरजवळ शिवशाही बसला आग लागल्याने शिवशाहीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीची घटना घडल्यानंतर एसटी महामंडळाकडून प्रत्येक वेळेस तांत्रिक कारणामुळे आग लागली असल्याचे सांगितले जाते; पण यावर कोणताही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही दाखल झाल्यापासून अधून-मधून बसला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी यवतमाळ-पुणे या शिवशाही बसला येरवडा परिसरातील शास्त्री चौकात आग लागली होती. यावेळी 44 प्रवाशांना अगोदरच खाली उतरविण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. ही घटना ताजी असताना बुधवारी सकाळी नाशिक-पुणे शिवशाही बसला सिन्नरजवळ अचानक आग लागली. या गाडीचा वेग कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने तत्काळ गाडी बाजूला घेतली. प्रवाशांना खाली उतरविले. ही पिंपरी-चिंचवड आगाराची बस होती. बसला आग कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झालेले नसले तरी प्रवाशांचा जीव गेल्यानंतर शिवशाही बसच्या आगीकडे महामंडळ गांभीर्याने पाहणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
येरवडा परिसर व नाशिक येथे आग लागलेल्या शिवशाही बसची तांत्रिक माहिती मागविण्यात आली आहे. त्यानंतर आगीचे कारण स्पष्ट होईल. शिवशाही बसला आग व इतर दुर्घटना घडू नये म्हणून दैनंदीन तपासणी केली जाते. त्याबरोबरच चालकांना आग लागल्यानंतर प्रवाशांना कशा पद्धतीने सुरक्षित बाहेर काढावे, फायर इस्टिंगव्हिशर कशा पद्धतीने हाताळावे, याचे प्रशिक्षण दिले आहे.
– रमाकांत गायकवाड, वाहतूक व्यवस्थापक, एसटी पुणे विभाग