सोलापूर – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू आता बदलला आहे. शिवसेनेचा केंद्रबिंदू हा अगोदर बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होता. आता मात्र शिवसेनेचा केंद्रबिंदू गांधी घराणे झालेला आहे. त्यामुळे आता शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
शिवसेना कॉंग्रेस पक्षाबरोबर गेली आहे. आता ती यूपीएत गेली तर मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आता दीर्घकाळ टिकू शकत नाही. सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्येसुद्धा दिसून येत आहे.
त्यामुळे राज्याचा विकास एक इंचसुद्धा पुढे गेलेला नाही. आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून तीन पक्षांची हे सरकार विसंवाद आणि आंतरिक विरोधातून शंभर टक्के कोसळणार असल्याचे भाकीतही प्रवीण दरेकर यांनी केले.
महाराष्ट्रात पाच वर्षे निष्कलंक अशी कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आतापर्यंत करू शकलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक रुपयाचा सुद्धा डाग लागलेला नाही. त्यामुळे या सर्वांचे उत्तर योग्य वेळी न्यायालय देईल. अशी प्रतिक्रियाही दरेकर यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाला दुरूनच नमस्कार केला आहे. विचारवंत ,लेखक आणि पत्रकार यांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे. जर अशा लोकांमुळे बेमालूमपणे समाजाच्या भावना बिघडल्या, श्रद्धास्थानांवर लिहिले तर ऍक्शनला रिऍक्शन मिळते, असे सांगत प्रवीण दरेकर यांनी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन केले.
ही कृती म्हणजे एक रिऍक्शन होती, मात्र अशा स्वरूपात ती करायला नको होती, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रेम हे बेगडी असल्याची टीकाही प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.
महाराष्ट्राचा विकास खुंटला…
महाराष्ट्रात जी विकास कामे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळांमध्ये गतीने मार्गी लागली होती. त्या कामांना पुढे नेण्याऐवजी कुठे रद्द करणे, त्यावर निधी न देता काम आडवणे, अशा प्रकारचं दुर्दैवी काम या सरकारच्या माध्यमातून दोन वर्षाच्या कालावधीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये कोरडवाहूसाठी तर 50 हजार रुपये बागायतीसाठी देण्याचं वचन तत्कालीन शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
आता अतिवृष्टी झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती दिली गेली. 10 हजाराची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी अजूनही 70 टक्के शेतकऱ्यांच्या हातात एक नवीन दमडी नाही.. पिक विम्याच्या संदर्भात देवेंद्र फडणीस यांच्या कालावधीमध्ये एक आदर्श जीआर कोल्हापूर ,सांगली, साताराला काढला. त्याची जरी अंमलबजावणी झाली असती तरी महाराष्ट्रातले सगळे शेतकरी समाधानी झाले असते, असेही दरेकर म्हणाले.