मुंबई – कोणी कितीही कटकारस्थाने केली किंवा बेईमानाचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती नव्याने जन्म घेऊन उसळेल आणि दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. कितीही संकटे येऊ द्या आम्ही त्यांच्या छाताडावर पाय देऊन उभे राहूच अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्यावतीने ( Thackeray Group ) देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह पोटनिवडणुकीपुरते गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली आहे.
त्यात शिवसेनेने ( Thackeray Group ) म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवले. पक्षाला त्याचे नाव वापरण्यासही मनाई करण्यात आली,दिल्लीने हे पाप केले. बेईमान गारद्यांनी आईशीच बेईमानी केली. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन महाराष्ट्रात काळाकुट्ट अंधार निर्माण केला. शिवसेनेचे अस्तित्व संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस भामटे दिल्लीचे गुलाम झाले.
त्यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने लिहिले जाईल. शिवसेनेच्या स्थापनेपासून गेल्या 56 वर्षात देशातील कोणत्याही दुष्ट राजकारण्यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे नावाच्या गारद्याने करून दाखवले आहे. त्या कामी दिल्लीने या गारद्यांना साथ दिली. शिवसेनेवर घाव घालून गारद्यांनी महाराष्ट्र पांगळा केला, हिंदुत्व रसातळाला नेले. या सगळ्याचा सूत्रधार भारतीय जनता पक्ष आहे असेही शिवसेनेने ( Thackeray Group ) यात नमूद केले आहे.