मुंबई – नरेंद्र मोदी सरकार सूर्यावरही आपले मिशन पाठवू शकते, परंतु त्यांनी प्रथम देशातील कांद्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अन्यथा सन 2024 च्या निवडणुकीत तुमचे यान कोठे भरकटेल याचा तुम्हाला पत्ताहीं लागणार नाही अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारवर कांद्याच्या विषयावरून निशाणा साधला आहे.
पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे की, कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. तो मोठे चटके सहन करीत आहे. चांद्रयान मोहीमेत राज्यकर्ते मात्र शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वत:ची टिमकी वाजवण्यात व्यस्त आहेत. ते आता चांद्रयान मोहीमेच्या यशाची पुंगी वाजवण्यात दंग आहेत. मिशन सन, मिशन शुक्र अशा वल्गना करून नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत.
मिशन सन वगैरे ठीक आहे, पण सध्या कांद्याचे भरकटलेले यान नीट लॅंड होण्याची गरज आहे. तुम्ही सर्याच्या दिशेने यान सोडा पण आधी कांद्याचे यान लॅंड करा असेहीं या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले. त्यामुळे कांद्याचे दर पडले.
त्यामुळे ज्याचा बळीराजा वगैरे उल्लेख करून सन्मान केला जातो तो शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. पण हाच शेतकरी आता निसर्ग जगू देत नाही आणि सरकार मरू देत नाही अशा कचाट्यात सापडला आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.