नारायणगाव – राज्यात महाविकास आघाडी असताना पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करीत आहे. अनेक ठिकाणी पक्षात फूट पाडण्याचे काम केले जात आहे. काही पदाधिकाऱ्यांना मारहाण, खोटे गुन्हे दाखल केले जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही.
आपण 15 वर्षे लोकप्रतिनिधी आहोत, असे असताना विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला विचारले गेले नाही. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार, अशी घोषणा शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमी जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख कार्यकर्त्याची बैठक नारायणगाव येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी आढळराव पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नगराध्यक्ष शाम पांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, संभाजी तांबे, दिलीप डुंबरे, शरद चौधरी, मंगेश काकडे, सरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, धनंजय डुंबरे, विविध गावाचे सरपंच, सदस्य, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, राज्यात आघाडी आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आघाडी होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी वाटत होती, पण स्थानिक राजकारण लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविला जातील आणि सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे मागे उभी राहील, असे त्यांनी नमूद केले.
शरद सोनवणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेनेला विश्वासात न घेत नाही. तालुक्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेत फूट पाडण्याचे छुपे डावपेच सुरू आहे. महाविकास आघाडी टिकेल का नाही यापेक्षा पक्ष संघटना बळकट करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी तर महेश शेळके यांनी आभार मानले.
जुन्नर तालुक्यात 66 पैकी 42 ग्रामपंचातीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. महाविकास आघाडीच्या धोरणांनुसार ग्रामपंचायत पातळीवर जागा वाटप न झाल्यास शिवसेने स्वबळावरच लढणार.
– माऊली खंडागळे, प्रमुख, जुन्नर तालुका, शिवसेना
कार्यकर्त्यांसाठी अस्तित्वाची लढाई
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना समाजकारण आणि राजकारणात आणण्याचा हा पाया असून ही निवडणूक कार्यकर्त्यांची अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या निवडणुकीत जुन्नर तालुक्यात 66 पैकी 42 ग्रामपंचायती ताब्यात होत्या. या निवडणुकीत 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व राहील, असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.