मुंबई – एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे, स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे, असा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री परिसरात करण्यात आलेला हल्ला आणि इतर काही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे,एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 23, 2022
तसेच भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या राड्याचा धागा पकडत देशपांडे यांनी शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचा दावा केला आहे.
राज्यातील घटनांवरून शिवसेनेवर टीका करत असताना संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यांवर भाष्य केले आहे. तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवले काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नको आहे. आम्ही काय चुकीचं बोलत आहोत? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.