राज्यमंत्र्यांसह दोन आमदारांना चाखावी लागली पराभवाची चव
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- युतीमध्ये शहरात भाजप तर ग्रामीण भागात शिवसेनेचा दबदबा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. प्रमोद महाजन यांच्यापासून चालत आलेल्या परंपरेला फडणवीस सरकारच्या काळात “ब्रेक’ लागला. पुणे शहरात शिवसेनेला एकही जागा न देता जिल्ह्यात खेड-आळंदी, जुन्नर, आंबेगाव-शिरूर, भोर, पुरंदर-हवेली, पिंपरी या सहापैकी आंबेगाव मतदारसंघ सोडला तर सर्व मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता. मात्र, यंदा हा दबदबा राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोडीत काढत जिल्ह्यातूनही शिवसेनेला हद्दपार केले आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेचे अस्तित्वच जवळपास संपवून टाकले असून हे शिवसेनेला आत्मपरिक्षण करणारी बाब ठरली आहे.
जिल्ह्यातील पुरंदर-हवेलीतून राज्यमंत्री विजय शिवतारे, पिंपरीमधून गौतम चाबुकस्वार, खेड-आळंदीमधून सुरेश गोरे, जुन्नरमधून शरद सोनवणे या चार मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना मतदारांनी “रामराम’ करीत राष्ट्रवादी कॉंग्रसेला संधी दिली. तर आंबेगाव मतदारसंघात शिवसेनेला शेवटपर्यंत उमेदवार सापडत नव्हता अखेर राजाराम बाणखेले यांना उमेदवारी दिली; मात्र त्यांचा प्रभाव कुठेही दिसला नाही. तर भोर विधानसभा मतदारसंघात 2014मध्ये ज्या पद्धतीने कुलदीप कोंडे यांनी “टफ फाईट’ दिली. त्याचप्रमाणे यंदाही कोंडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांचा जोरदार लढत दिल्याने यंदा आमदार थोपटे यांची “हॅट्ट्रिक’ हुकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र, शेवटी आमदार थोपटे यांनीच बाजी मारली.
- राज्यमंत्री शिवतारे यांचे “कॅबिनेट’ पद गेले
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यंदा “हॅट्ट्रिक’ साजरी करणारच असा चंग शिवसेनेने बांधला होता. तर त्यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत यंदा शिवतारे यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल करणार असेही थेट जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांचा करिश्मा मतमोजणीत कुठेही दिसला नाही. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही शिवतारे यांच्यासाठी हवेलीत सभा घेत मतदारांना साद घालत शिवतारे माझे आवडते व्यक्तीमत्व असल्याने त्यांना यंदा राज्यात महत्त्वाची जबाबदारी देणार असे जाहीर केले होते. त्यामुळे यंदा शिवतारे “हॅट्ट्रिक’ करणारच असा शिवसेनेला आत्मविश्वास होता; मात्र हा आत्मविश्वास त्यांना नडला, तर शिवतारे यांचे गुंजवणीच्या पाण्याचे आश्वासन “गाजर’च असल्याचे विरोधकांचे म्हणणे खरे ठरले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. - खेडमध्ये भाजप बंडखोरीचा शिवसेनेला फटका?
खेड-आळंदीमधून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांच्या विरोधात महायुतीतीलच भाजपचे बंडखोर अतुल देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकले होते. भाजपचे इतर पदाधिकारी, नेते यांनी युतीधर्म मोडीत काढत आमदार गोरे यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार देशमुख यांच्या पाठिशी उभे राहिल्याने तिथेच गोरेंचे मताधिक्य कमी झाले अन् गोरे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने बंडखोरीमुळेच शिवसेनेचे गोरे यांचा पराभव झाला, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. - जुन्नरमध्ये शरद सोनवणेंना शिवसैनिकांनीच पाडले
जुन्नर विधानसभा मतदारसंघात 2014मध्ये मनसेचा एकमेव आमदार म्हणून शरद सोनवणे निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी 2019मध्ये लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाला होता. त्यात आशा बुचके यांची थेट हकालपट्टी केल्याने त्यांना सहानभुतीची लाट निर्माण झाली होती. तर माझ्या कामांमुळे माझा विजय निश्चित असून शिवसैनिक माझ्या पाठिशी असल्याचे सोनवणे छातीठोकपणे सांगत होते; मात्र जुन्नरमधील निष्ठावान शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार आशा बुचके यांना पाठिंबा दिला. बुचके-सोनवणेंच्या भांडणात राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय झाल्याने जुन्नरमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना हरल्याचे म्हणावे लागेल. - उपनेते शिवाजीराव आढळराव पाटलांना धक्का
शिरूर लोकसभा मतदारसंघात 2005, 2009, 2014 अशी सलग तीन वेळा शिवाजीराव आढळराव पाटील खासदार राहिले होते. मात्र, 2019च्या निवडणुकीत त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. मात्र, त्यांचे संघटन आणि त्यांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा कायम ठेवतील यासाठी त्यांना उपनेतेपदही बहाल केले. मात्र, शिवसैनिकांची त्यांना हवी तशी साथ न मिळाल्याने त्यांचे वर्चस्व असलेला जुन्नर, खेड विधानसभा मतदारसंघातही यंदा आमदारकीही गमवावी लागली. तर आंबेगावात यंदा परिवर्तन करणारच अशी गर्जनाही त्यांनी या निवडणुकीआधी केली होती; मात्र त्या ठिकाणी उमेदवार मिळता मिळत नव्हाता. अखेर उमेदवार मिळाला पण तोही दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आढळराव पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.