दिल्ली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रविवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे म्हंटले जात आहे. यानंतर आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एक ट्वीट करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत लिहिले की, “काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.”
पुढे त्यांनी लिहिले की, “राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार….”
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/MdLoqiPoy2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
दरम्यान, आगामी सर्व निवडणूका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढवणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याशिवाय अद्याप मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. त्याबाबत या भेटीदरम्यान चर्चा झाली की नाही? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.