मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. मुंबईतील वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात फसवणूक आणि धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार नितीन बरई यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खानसोबत इतर काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये काशिफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रासोबत मिळून नितीन बरईला 1 कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.
पण नंतर जेव्हा काही सुरळीत चालत नव्हते, तेव्हा नितीनने त्याचे पैसे परत मागितले. त्यानंतर त्याला धमकी देण्यात आली, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारकर्त्याने म्हटले आहे की, जुलै 2014 पासून आतापर्यंत मेसर्स एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे डायरेक्टर शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केली.
बरई यांनी सांगितलं की, त्याला सांगण्यात आले होते की, जर त्याने यांच्या कंपनीची फ्रंचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केल्यास खूप फायदा होईल.
यानंतर बरई यांना एक कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले. हा पैसा आरोपींनी आपल्या फायद्यासाठी वापरला आणि पैसे परत मागितल्यानंतर धमकी देण्यात आली, असे बरई यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिस सर्वांची चौकशी करणार आहेत. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांना लवकर संपर्क केला जाणार आहे.