नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी इंडिया या विरोधकांच्या आघाडीला भारत असे पर्यायी नाव सुचवले. विरोधकांच्या आघाडीने पर्यायी नाव स्वीकारल्यास कदाचित सत्तारूढ पक्ष नावे बदलण्याचा मूर्खपणाचा खेळ थांबवेल, असे उपरोधिक भाष्य त्यांनी भाजपवर निशाणा साधत केले.
देशासाठी इंडियाऐवजी केवळ भारत या नावाचा वापर केला जावा यादृष्टीने मोदी सरकार विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे. विरोधकांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाव भाजपला अस्वस्थ करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.
तोच धागा पकडून थरूर यांनी सोशल मीडियावरून उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. विरोधकांच्या आघाडीने आता अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मनी अँड रिस्पॉन्सिबल ऍडव्हान्समेंट फॉर टुमॉरो (भारत) असे नाव धारण करावे, असे त्यांनी म्हटले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले. विरोधकांच्या आघाडीमुळे सरकार देशाच्या नावाविषयी विचार करत असेल; तर आम्ही आमच्या आघाडीचे नाव बदलण्यास तयार आहोत. आम्हाला देशाला अडचणीत आणायचे नाही, असे ते पुलवामात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.