मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांकडून नफा काढून घेणे चालूच झाले आहे. त्यामुळे कालच्या प्रमाणे आजही शेअर बाजाराच्या मुख्य निर्देशांकांत अल्प घसरण झाली. मुख्य निर्देशांक वाढले असल्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी चालू आहे. परिणामी आज शेअर बाजाराचे स्माल कॅप आणि मिड कॅप वाढल्याचे दिसून आले.
अर्थसंकल्प सादर झाल्यापासून बॅंकिंग क्षेत्राच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आता याच क्षेत्रातून गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्राच्या निर्देशांकात घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ 19 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी कमी होऊन 51,309 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन अंकांनी कमी होऊन 15,106 अंकांवर बंद.
जागतिक शेअर बाजारातील निर्देशांक वाढत असूनही भारतातील शेअर बाजारात मात्र खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. कारण भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक अतिशय उच्च पातळीवर असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. एचडीएफसी बॅंक, भारती एअरटेल, ऍक्सिस बॅंक, नेस्ले इंडिया, एल अँड टी, इन्फोसिस, स्टेट बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर बजाज फिन्सर्व, महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायंस इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
वाहन आणि ग्राहक वस्तू या क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरची जास्त प्रमाणात खरेदी झाली. दूरसंचार, भांडवली वस्तू, उर्जा या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. अमेरिकेत लसीकरणाला वेग आला आहे. त्याचबरोबर कंपन्यांचे चांगले ताळेबंद जाहीर झाले आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये नव्या प्रशासनाने नागरिकांना व कंपन्यांना मदत करण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारातील निर्देशांक आज वाढल्याचे दिसून आले.
मुख्य निर्देशांकात अल्पशी घट झाली असली तरी छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये बुधवारी 0.71 टक्क्यापर्यंत वाढ झाली. जागतिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे क्रुडचे दर गेल्या आठवड्यापासून वाढत आहेत. त्यातच तेल कंपन्यांनी उत्पादन कमी करण्याचे ठरविले असल्यामुळे आजही क्रुडचे दर वाढले असल्याचे दिसून आले.
भारतातील किरकोळ गुंतवणूदार गुंतवणूक काढून घेत असले तरी परदेशी गुंतवणूकदाराकडून खरेदी चालूच असल्याचे वातावरण आहे. काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,300 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.