पुणे – प्रसिद्ध गायिका शारदा राजन अय्यंगार यांचे काल 14 जून रोजी निधन झाले आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून शारदा या कॅन्सरमुळे आजारी होत्या. शारदा यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1937 रोजी तामिळनाडूतील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. शारदा यांनी बॉलिवूडसह तेलुगू, मराठी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली आहेत. 1970 मध्ये आलेल्या ‘जहां प्यार मिले’ या चित्रपटात ‘बात जरा है आप की’ हा कॅबरे गाण्यासाठी त्यांना महिला पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
1966 मध्ये आलेल्या ‘सूरज’ चित्रपटातील ‘तितली उडी उड जो चली फूल’ हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाणे होते. शारदा यांना हे गाणे चित्रपट निर्माते राज कपूर यांनी ऑफर केले होते. राज कपूर यांनी शारदा यांना तेहरानमध्ये गाणे गाताना ऐकले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शंकर जयकिशन यांच्यासोबत दीर्घकाळ काम केले.
शारदा यांनी आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, यशुदास, मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले. 2007 साली प्रसिद्ध झालेला त्यांचा गझल अल्बम ‘अंदाज-ए-बयान’ मिर्झा गालिबच्या लोकप्रिय गझलांवर आधारित होता. पॉप अल्बम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. 1977 मध्ये सिझलर्स हा त्यांचा पॉप गाण्यांचा अल्बम प्रदर्शित झाला होता.