मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, महाविकास आघाडीत राज्यसभेची चौथी जागा कोणी लढवायची याचा अंतिम निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रवादीच्या माजी मंत्री फौजिया खान यांच्या उमेदवारी अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांद्वारे राज्यसभेवर निवडूण गेलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. या रिक्त जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या, शुक्रवारी संपत आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार यांनी बुधवारी विधानभवनात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल तसेच आघाडीचे मंत्री उपस्थित होते.
राज्यसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय आघाडीने केला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन, तर कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येक एक जागा लढविणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसने फौजिया खान यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. मात्र, कॉंग्रेस दोन जागांसाठी अडून बसली आहे. त्यामुळे कॉंग्रेस तसेच आघाडीच्या समन्वय समितीत चर्चा होऊन चौथ्या जागेच्या संदर्भात अंतिम निर्णय होईल.
दरम्यान, आघाडीकडून चार तर भाजपकडून तीन उमेदवार दिल्यास राज्यसभेसाठी मतदान घेण्यात येणार नाही. उमेदवारी अर्ज वैध ठरून माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून राज्यसभेवर निवडून गेलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल.
भाजपकडून उदयनराजे भोसले, आठवलेंना उमेदवारी
भाजपने महाराष्ट्रातून सातारचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर जातील. भाजपने अजून तिसरा उमेदवार जाहीर केलेला नाही. तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे, विजया रहाटकर, संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच भाजपकडून अन्य राज्यातील उमेदवारी दिला जाऊ शकतो.