सातारा – किसन वीर सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर होऊन आ. मकरंद पाटील यांनी कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार पहिल्यांदाच कारखान्यात येत आहेत. शरद पवार कारखान्याला सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी भेट देणार असून यावेळी गाळप हंगामास सुरुवात होणार आहे. शरद पवार यांच्या या दौऱ्यामुळे मकरंद आबांना ताकद मिळणार आहे.
किसन वीर सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. याबाबत सभासद, कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. या संकटाच्या काळात आ. मकरंद पाटील, नितीनकाका पाटील यांनी कारखान्यात लक्ष घालून सभासदांना न्याय द्यावा, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर कारखाना निवडणुकीत सत्तांतर होवून कारखाना मकरंदआबांच्या ताब्यात आला आहे. अडचणीतून कारखाना बाहेर यावा यासाठी खा. शरद पवार, अजित पवार यांनीही प्रयत्न केले. चेअरमन आ. मकरंद पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कारखान्याच्या संचालकांनी कार्यक्षेत्रात गावोगावी फिरुन शेअर्स घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर कारखान्याचा गळित हंगाम सुरु होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.
कारखाना व्यवस्थापनाने सभासद, कामगारांना विश्वासात घेऊन मोठ्या जिद्दीने कारखान्याचे गाळप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या गाळप शुभारंभ कार्यक्रमास दि. 7 नोव्हेंबरला खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवार कारखान्यावर येणार असल्याने आगामी काळात कारखान्यासमोरील संकटे निश्चितच सुटतील असा विश्वास सभासदांमधून व्यक्त होत आहे.