सातारा – मेढा ते महाबळेश्वर रस्त्यावरील चिंचणी (ता. सातारा) गावाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.
रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय 56, रा. मेढा, ता. जावळी), भरत यदू शेलार (वय 40, रा, काळोशी, ता. जावळी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय राजाराम देशमुख (रा. कोरेगाव) हे कारने कोरेगावला निघाले होते. त्यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी हर्षदा, मुलगा वेदांत, मुलगी प्रियंका आणि सासू कमल कासुर्डे असे पाच जण होते. दत्तात्रय देशमुख कार चालवित होते.
चिंचणी गावच्या हद्दीत कार आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील रघुनाथ चिकणे आणि भरत शेलार काही अंतर हवेत उडून खाली पडले. त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली. दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. कार चालक दत्तात्रय देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले, पत्नी, सासू हे सुद्धा गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांची सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. हवालदार मालोजी चव्हाण तपास करीत आहेत.