कोरेगाव – सातारा रोड नजिकच्या भक्तवडी- रेवडी रस्त्यावरील वसना नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यास गेलेल्या ऊस तोडणी कामगार सुरेश बंडू उगले याचा बुडून मृत्यु झाला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगावच्या दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांचा देखील बुडून मृत्यु झाला. या घटनेमुळे कोरेगाव शहरात शोककळा पसरली आहे. शोकाकूल वातावरणात बर्गे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उगले याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार एका साखर कारखान्याची ऊस तोडणाऱ्या कामगारांची टोळी भक्तवडी येथे दाखल झाली असून या टोळीतील कामगार सुरेश बंडू उगले आपल्या मित्रांसमवेत वसना नदीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उडी मारल्यानंतर तो बुडाला. ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याचा मृतदेह सापडला नसल्याने कोरेगाव पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी कोरेगावातील पट्टीचे पोहणारे दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांना मोबाइलवरुन संपर्क साधला आणि मृतदेह काढण्यासाठी बोलावून घेतले. गुरुवारी दुपारच्या सुमारास बर्गे नदीपात्रात उतरले.
मात्र, त्यांचाच बुडून मृत्यु झाला. तासाभरात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी बर्गे यांचा मृतदेह एका खासगी गाडीतून ग्रामीण रुग्णालयात नेला. त्यांनी बर्गे कुटुंबीयांना अथवा नातेवाइकांना कोणतीही कल्पना दिली नाही. त्यानंतर पोलीस निघून गेले. रुग्णालयातील महिला परिचारिकेमुळे बर्गे कुटुंबीयांना घटनेची माहिती समजली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांसह नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला.
वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेरीस चर्चेद्वारे तणाव निवळला. रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी राहुल पुरुषोत्तम बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, हा गंभीर प्रकार असून संशयास्पद आहे. दत्तात्रय बर्गे यांच्या मृत्यूची व प्रकाराची चौकशी करण्यात यावी. त्यांच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.शुक्रवार दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास सुरेश उगले याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला आढळून आला. दोन दिवसांनी मृतदेह सापडल्याने ग्रामस्थ व ऊस तोडणी कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.