आळंदी – श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता अमराळे हिने केले. या प्रसंगी सर्व सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीणकुमार एच. पानस्कर म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना केवळ अभ्यास करूनच न थांबता करियर साठी लागणाऱ्या महत्वपूर्ण गुणांचा विकास करणेही आवश्यक आहे. कोणतेही कार्य असे करा की, ज्यातून स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चिती करणे आवश्यक असून नोकरी करतांना कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजेत या संदर्भात विवेचन करीत संधी मिळाल्यानंतर नोकरी टिकविण्यासाठी स्थिरता कशी महत्वपूर्ण असते यासंदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात म्हणाले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण, मिळालेले पुरस्कार तसेच देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपतीपदापर्यंतचा संपूर्ण इतिहास सविस्तर रेखाटला. शिक्षक हा देशाचा निर्माता असून कोणत्याही व्यक्तीचा, समाजाचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर शिक्षकाचा आदर केला पाहिजे. या संदर्भात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक व एकपात्री नट प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या जीवनातील जर्मनीमधील शिक्षकांचा आदर कसा केला जातो या संदर्भातील जिवंत उदाहरण सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक काळात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपण जगाच्या मार्केटमध्ये टिकू शकत नाही, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयुर ढमाले यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रवीण भावे, प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.दिलीप बारी, प्रा. परमेश्वर भत्तासे, प्रा, पारप्पा दुपारगुडे, प्रा.शैला वाळुंज, डॉ. छाया जोशी, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे, डॉ.समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, डॉ.प्रीती बुऱ्हाडे, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा.पुजा खवले, वर्षा ताजणे, नेहा लांडगे, विनोद मोगल, वैभव बडवे, श्रीकांत कांबळे, यशवंत मखवाना इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.ए.,बी.कॉम आणि बी. बी. ए. (सी.ए.) शाखेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश संगवे व कार्तिका सोनवणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्नेहल कदम हिने मानले. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदान झाली, अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभागप्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.