-डॉ. दिलीप गरुड
5 सप्टेंबर 1888 हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. सबंध देशभर हा दिवस “शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. त्यांना वंदन केले जाते. शिक्षकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी प्राध्यापक, कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, युनेस्कोचे अध्यक्ष, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य, भारताचे रशियातील राजदूत, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती अशा अनेक भूमिका निभावल्या. पण त्यांची खरी ओळख “शिक्षक’ हीच होती. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस हा “शिक्षक दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. 1905 मध्ये त्यांनी चेन्नईमधून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान. या सृष्टीव्यापाराच्या मागे असलेल्या शक्तीचे ज्ञान करून घेणे. कुणी त्याला ब्रह्मज्ञान असेही म्हणतात.
डॉ. राधाकृष्णन यांचे आडनाव अय्यर आहे; परंतु आपण सर्वजण त्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच नावाने ओळखतो. खरं म्हणजे पूर्वी कधीकाळी त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावात राहात असत. नंतर हे कुटुंब पोटापाण्यासाठी आंध्र प्रदेशातील तिरुत्ताणी या गावी स्थायिक झाले; परंतु मूळ गावाचे नाव त्यांच्या नावापुढे लागले ते कायमचे. 1908 साली त्यांनी एम.ए.ची पदवी प्राप्त केली. त्या वर्षी मद्रास (चेन्नई) विद्यापीठातून एम.ए.ला तत्त्वज्ञान विषय घेणारे ते एकमेव विद्यार्थी होते.
एम.ए.च्या पदवीसाठी त्यांनी एक प्रबंध लिहिला. प्रबंधाचा विषय होता “वेदान्तातील नीतिशास्त्र’ वेदान्त म्हणजे वेदांचे सार ज्या ग्रंथात सांगितले आहे असे ग्रंथ. त्यावेळी काही लोक म्हणत की वेदान्तामध्ये नीतिशास्त्राला काही स्थान नाही. मात्र, राधाकृष्णन यांनी त्यांच्या प्रबंधात सप्रमाण दाखवून दिले की, नीती आणि वेदान्त हे परस्परावलंबी आहेत. राधाकृष्णन यांनी हा प्रबंध लिहिला तेव्हा त्यांचे वय होते 20 वर्षे. इंग्रजीमध्ये लिहिलेला हा प्रबंध “दि इथिक्स ऑफ वेदान्त’ या शीर्षकाने प्रकाशित झाला.
या प्रबंधाबद्दल प्रोफेसर ए. जी. हॉग म्हणतात, “या विद्यार्थाने जो प्रबंध लिहिला आहे, तो वाचल्यानंतर तत्त्वज्ञानासंबंधीचे सखोल ज्ञान या विद्यार्थ्याजवळ आहे याची प्रचिती येते. तत्त्वज्ञानातील प्रमुख गोष्टी तर त्याला ठाऊक आहेतच, पण संभ्रमात पाडणारे प्रश्नही तो आपल्या बुद्धीने सहजपणे सोडवू शकतो. त्याशिवाय इंग्रजी भाषेवर त्याचे अनन्यसाधारण प्रभुत्व आहे.’ हा प्रबंध वाचण्यासाठी लोकमान्य टिळक यांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आला. प्रबंध वाचून टिळकांनी संतोष व्यक्त केला आणि त्यांच्यात भविष्यकालीन तत्त्वज्ञ लपलेला आहे याची टिळकांना जाणीव झाली.
राधाकृष्णन यांनी धर्मशास्त्र, अध्यात्म, भारतीय संस्कृती, वेदवाङ्मय, नीतिशास्त्र, या विषयांवरील ग्रंथ बारकाईने वाचून काढले. हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करतानाच त्यांनी इतर धर्मांचाही तौलनिक अभ्यास केला. त्यांनी गौतम बुद्ध, शंकराचार्य, कणाद मध्वाचार्य, या भारतीय परंपरेतल्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचा मागोवा तर घेतलाच पण प्लेटो, ऍरिस्टॉटल, कांट, हेगेल इत्यादी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानी मंडळींच्या ग्रंथांचेही अध्ययन केले.
1909 मध्ये ते चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. अवघड विषय ते सोपा करून शिकवीत. त्यांच्या तासाला विद्यार्थ्यांची गर्दी होई. मात्र, सुटाबुटात न वावरता ते भारतीय पेहरावात वावरत. त्यांची अचाट बुद्धिमत्ता पाहून हे परदेशात शिकून आलेत की काय अशी विद्यार्थ्यांना शंका येई. एका विद्यार्थ्याने ती शंका बोलून दाखविली, तेव्हा राधाकृष्णन नम्रपणे म्हणाले, “”मी परदेशात शिकायला नाही पण शिकवायला नक्की जाईन” आणि पुढे खरोखरच त्यांनी इंग्लंड, अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांत व्याख्याने दिली.
चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये 8 वर्षे अध्यापन केल्यानंतर ते म्हैसूरच्या कॉलेजमध्ये दाखल झाले. म्हैसूरमधल्या 3 वर्षांच्या काळात त्यांनी “रवींद्रनाथ टागोरांचे तत्त्वज्ञान’ व “समकालीन तत्त्वज्ञानामध्ये धर्माचे स्थान’ ही दोन पुस्तके लिहिली. पुढे म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी कोलकत्ता विद्यापीठात जायचे ठरविले.
आपल्या “कल्की अर्थात मानवी संस्कृतीचे भवितव्य’ या ग्रंथात राधाकृष्णन म्हणतात, “विज्ञानाने माणसाला भौतिक सुखाची साधने मिळवून दिली. त्यामुळे चैन वाढली. पण माणूस खरोखरच सुखी होऊ शकला का? तर नाही. शरीराव्यतिरिक्त त्याला आत्मा आणि बुद्धीही आहे. हे विज्ञान आत्म्याची भूक भागवू शकते का? तर उत्तर नकारार्थी येते. त्यासाठी धर्माची कास धरावी लागते. पुढे बनारस विश्वविद्यालयाचे कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, युनेस्कोचे अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे सदस्य, रशियात भारताचे राजदूत, दहा वर्षे भारताचे उपराष्ट्रपती आणि 1962 मध्ये राष्ट्रपती अशा विविध पदांवर यशस्वीपणे काम करून ते 1967 मध्ये निवृत्त झाले.
निवृत्तीचा काळ त्यांनी चेन्नईमध्ये वाचन, लेखन, चिंतन यात घालविला, 24 एप्रिल 1975 मध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. 87 वर्षांची यशस्वी वाटचाल करून ते देवाघरी गेले. “तत्त्वज्ञ शिक्षक’ हीच त्यांची ओळख भारतीयांच्या मनात खोलवर रुजली आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन!