मुंबई – आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. मागील २० दिवसांपासून या प्रकरणावरून वाद सुरू आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजात नाराजी असल्याचं बोलल जात आहे. आता पीडितेची आजी म्हणून समोर आलेल्या शांताबाई चव्हाण यांच्याविषयी नवीन सत्य समोर आलं आहे.
मृत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी आज माध्यमासमोर आपलं मत व्यक्त केलं. माझ्या घरी मंत्री संजय राठोड आले होते. त्यांनी मीच बोलवल होतं. त्यांना राजीनामा द्यावा लागला हे योग्य नाही. संपूर्ण बंजारा समाजात राठोड यांच्या राजीनाम्यामुळे नाराजी आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनंती केली होती, की राजीनामा घेण्याची घाई करू नये, असं पूजाच्या वडिलांनी सांगितले.
दरम्यान पूजा चव्हाणची आजी असल्याचा दावा करणाऱ्या शांताबाई चव्हाण यांच्याविषयी पूजाच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला. भावकी असेल पण २५ वर्षांपासून शांताबाई आणि आमची भेट नाही की, येणं-जाणं नाही, असंही पूजाच्या वडिलांनी सांगितले. असंच कोणीही येऊन फिर्याद देईल, हे याचा तपास करणं सरकारचं काम असल्याचे त्यांनी सांगितले. शांताबाई चव्हाण यांनी पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. तसेच आपण पूजाची आजी असल्याचा दावा केला आहे.