सातारा (प्रतिनिधी) : करोनाला रोखण्यासाठी २४ तास रस्त्यावर असणार्या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व त्यासाठी करेक्ट नियोजन करण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यात देसाई यांच्या ‘कोयना दौलत’ या निवासस्थानी सुमारे पाऊण तास बैठक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या राज्यात करोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या महामारीच्या प्रसंगात पोलीस मोठ्या धैर्याने २४ तास रस्त्यावर उभा राहत आहेत. कामाशिवाय घराबाहेर न येण्याचे अवाहन ते लोकांना करत आहेत. हे काम करत असताना राज्यातील ७६७ पोलिसांनाच करोनाची बाधा झाली तर त्यातील सात पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच अनेक ठिकाणी पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत. यामुळे राज्यातील पोलीसांच्यात प्रचंड भीतीचे व असुरक्षित वातावरण आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांना करोनाची बाधा न होण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना बंगल्यावर पाचारण केले होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झालेली बैठक साडेसहा वाजण्याच्या सुमारास संपली. यावेळी पोलीस दलाची कार्यपध्दती, किरकोळ तक्रारी याबाबतही ना. देसाई व एसपी याच्यांत झाल्याची सुत्रांची माहिती आहे.