मुंबई – आरोग्य मंदिरे सुरू आहेत, ती बंद करून मंदिरे खुली करू का? असा सवाल भाजपाचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उद्देशून करून उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपाला अप्रत्यक्ष फटकारले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या सुनावलं. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.
आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरे मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. धार्मिक स्थळे उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटील तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला आरोग्य केंद्र बंद करून मी मंदिरे उघडू. आज आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम देतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे 92-93 मध्ये आम्ही दाखवून दिल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले.
फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे संकेत
मधल्या काळात जी काही घटना ठाण्यामध्ये घडली. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेने काम हे आपल्याला करावं लागेल, असे ठाकरे म्हणाले.