पिंपरी – बारावीचा निकाल लागला आणि त्यानंतर नीट ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा देखील संपन्न झाली. अजून या परीक्षेचा निकाल लागायचा आहे, परंतु त्यापूर्वीच शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना रशियाची ओढ लागू लागली आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्याला रशियाला पाठविण्याची मानसिक तयारी केली आहे आणि त्या दृष्टीने नियोजन देखील सुरू केले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत भारताने हजारो विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुरक्षित परत आणले होते. त्यानंतर रशिया आणि युक्रेनकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु अजूनही मध्यमवर्गासाठी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी रशिया हाच देश उत्तम वाटत आहे.
युद्ध काळादरम्यान युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी परत आणण्यात आले होते. त्यात पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांची संख्या खूप अधिक होती. अजून युद्ध पूर्णपणे शमलेले नसतानाही शेकडो विद्यार्थ्यांनी रशियाला जाण्याची तयारी सुरू केली आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नंबर लागण्याची कमी शक्यता आणि नंबर लागलाच तरी कोणत्याही परिस्थितीत खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थाचे न परवडणारे शुल्क. यामुळे रशिया हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचे हब ठरत आहे.
विद्यार्थिनींची संख्या अधिक
युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यावर भारतीय विद्यार्थ्यांना परत आणले जात होते. तेव्हा युक्रेनमध्ये शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिंनीची संख्या अधिक असल्याचे प्रकर्षाने जाणवले होते. यंदाही रशियाला जाऊ इच्छिणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींचीच संख्या अधिक असल्याचे एका शैक्षणिक सल्लागाराने सांगितले.
देशातील महागडे शिक्षण मुख्य कारण
देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षण खूप महाग झाले आहे. डोनेशन आणि एकूण शुल्क एक कोटीच्या घरात जात असल्याने मध्यमवर्गासाठी हा पर्याय अशक्य आहे. तसेच मेरिटच्या कट-ऑफमध्ये अनेकांना संधी मिळ नाही, यामुळे बहुतेक विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी रशिया आणि युक्रेनला प्राधान्य देत आले आहेत. यावर्षी मात्र रशियाकडे सर्वाधिक ओढा आहे. नीटचा निकाल निराशाजनक लागल्यास या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चार दशकांहून अधिक काळापासून भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला जात आहेत. कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश, महाविद्यालयाच्या शुल्काव्यतिरिक्त डोनेशन किंवा कॅपिटेशन फी भरावी न लागणे आणि मुख्य म्हणजे 25 ते 35 लाखांत सुमारे सहा वर्षांचा वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम पार पडणे, या गोष्टींमुळे डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी रशियाला जाण्याचा विचार प्राधान्याने करतात.
सुरक्षिततेची भावना
रशियातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राहते. तसेच भारत आणि रशियाच्या सलोख्याच्या संबंधांमुळे तेथे राहणे विद्यार्थ्याना सुरक्षित वाटत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. रशियात शिक्षण घेणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील एका विद्यार्थीनीने दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की, रशियातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त चांगली आहे. तसेच वातावरण खूपच सुरक्षित आहे. शिक्षण भारतासारखेच आहे. आम्ही भारतातूनच वह्या-पुस्तके घेऊन जातो. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या खूप अधिक असल्याने एकटेपणाची भावना येत नाही. तेथील स्थानिक रुग्णांशी डॉक्टरांचा सततचा संपर्क असल्यामुळे अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी रशियन भाषा शिकायला मिळते.