मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेवरून राजकारण तापलं आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तर भाजपने यासाठी पंजाबमधील काँग्रेस सरकारला जबाबदार धरलं आहे. आता यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपमधील अंतर्गत बाबीवरून शंका उपस्थित केली आहे.
नाना पटोले म्हणाले की, एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना, असा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. असे करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितले पाहिजे, असा संशय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
पाच राज्यांत निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकार या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रूपे बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केले. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल, असेही नाना पटोले म्हणाले.
वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, असे नाना पटोले यांनी याआधी म्हटलं होतं.