पुणे – खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि जिल्हा परिषद यांच्याकडून हा आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यानुसार आवश्यक त्या ठिकणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच धरणालगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावांमधून, तसेच पाणलोट क्षेत्राच्या परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर धरणात येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणात आली आहे. यासमितीची बैठक नुकतीच झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
पाणलोट क्षेत्रात नेमके किती पाणी मिसळते, हे पाणी कुठून येते, यांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सांगण्यात आले होते. परंतु मंडळाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी पीएमआरडीए आणि जिल्हा परिषदेने त्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार सल्लागार नेमून डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एक महिन्याच्या आत संबंधित सल्लागार कंपनीने अहवाल सादर करावा, असेही या बैठकीत ठरले.