रेडा -इंदापूर तालुका अद्याप करोनामुक्त आहे. पण सध्या तालुक्यात 11 हजार 600 जण गावाकडे आले आहेत. या नागरिकांना आमचा विरोध नाही मात्र, जर करोनाचा आजार तालुक्यात बळावला तर तालुक्यामध्ये यावर निदान करणारी यंत्रणा किंवा उपचार यंत्रणा नसल्याने काळजी वाटते. तरी तालुक्यामध्ये येत्या तीन ते चार दिवसांत किमान पाच करोना चाचणी सेंटर उभारण्यात यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागाचे तसेच आरोग्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याशी तसेच जिल्हाधिकारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत सातत्याने करोना चाचणी सेंटर उभारण्यासाठी संपर्कात आहे.
तालुका करोनामुक्त असला तरीदेखील गाफीलपणा करून चालणार नाही. तालुक्याची लोकसंख्या साडेचार लाख असताना व तब्बल 73 हजार रेशनकार्डधारक कुटुंब असताना, करोना चाचणी सेंटर तालुक्याच्या हद्दीत नाहीत. हे दुर्दैव आहे. मला कोणावरही टीका करायची नाही. मात्र सामाजिक जाणिवेतून भिगवण, इंदापूर, बावडा, सणसर, निमगाव केतकी या पाच ठिकाणी करोना चाचणी सेंटर उभारले जावेत. तसेच किमान तीन ते चार डॉक्टरांचे पथक उपलब्ध करणे गरजेचे आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये 15 ते 20 हजार मजूर यांच्या हाताला काम नसल्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मनरेगाच्या माध्यमातून या गरीब नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. रेशनधारक कुटुंबांना धान्याचा पुरवठा अद्यापही पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जवळपास 225 स्वस्त धान्य दुकानदारांची संवाद साधून तालुक्यातील कुटुंबांना रेशनचा पुरवठा नियमाने करावा, असे हर्षवर्धन पाटलांनी नमूद केले.