नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवाचे समिक्षण करायचे तर संघाला क्षेत्ररक्षणाबाबत खूप गंभीर होण्याची आवश्यकता आहे, असे मत भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व अव्वल क्षेत्ररक्षक महंमद कैफ याने व्यक्त केले आहे.
जागतिक क्रिकेटमध्ये जितके संघ आहेत त्यांच्याकडे अव्वल क्षेत्ररक्षक आहेत. भारतीय संघात कर्णधार कोहली, रोहित शर्मा हे दोघे उत्तम क्षेत्ररक्षण करतात, मात्र, जो दर्जा जॉन्टी ऱ्होड्स याने सिद्ध केला त्याच्या जवळपासही कोणी जाणार नाही. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून फलंदाजी व गोलंदाजीबाबत जितके गांभीर्य दाखवत आलो आहे त्यापेक्षाही जास्त गांभीर्य क्षेत्ररक्षणाबाबत दाखवले गेले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात भारतातील मैदानांची अवस्था पाहता कोणी खेळाडू चेंडू अडविण्यासाठी, झेल घेण्यासाठी स्वतःला मैदानावर झोकून द्यायला तयार नसायचा. दुखापत होईल ही भीती जवळपास प्रत्येकालाच होती. मला देखील भीती वाटायची पण तरी देखील क्षेत्ररक्षणाच्या जोरावरही सामने जिंकले जातात हे मी ऱ्होडस्कडून शिकलो व क्षेत्ररक्षणाची आवड निर्माण झाली, असेही कैफने सांगितले.