पुणे – राज्यात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हिवाळ्यामुळे वातावरणातील प्रदूषित वायू आणि धूलिकण हे हवेतच राहिल्याने हवेची गुणवत्ता खराब होत आहे. या प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. साधारणत: नोव्हेंबर महिन्यापासून राज्यात विविध शहरांची हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
खबरदारी म्हणून राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना आरोग्य उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. तसेच काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रताप सारणीकर यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी जनजागृती करणे व वायू प्रदूषणाला संवेदनशील असलेल्या घटकांना होणाऱ्या परिणामांपासून वाचवण्याकरता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आरोग्याबाबत काळजी घेण्याचे तसेच उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. कारण एखाद्या क्षेत्रात खराब ते गंभीर श्रेणीत असताना हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक बिघडल्याने संसर्ग झालेल्या लोकांमध्ये विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.
राज्याचा हवा निर्देशांक 200 च्या पुढे आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वायू प्रदूषण म्हणजे आपण श्वास घेत असलेल्या हवेच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करणाऱ्या वायू आणि घन कणांच्याद्वारे घरातील किंवा बाहेरील हवेचे दूषित होणे, आरोग्यास हानिकारक मुख्य प्रदूषकांमध्ये कणिक पदार्थ कार्बन मोनोऑक्साइड, ओझोन, ब्लॅक कार्बन, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड यांचा समावेश होतो.
वायू प्रदूषण बहुतेक वेळा उघड्या डोळ्यांना दिसत नाही. कारण प्रदूषकांचा आकार सुक्ष्म असतो. तो साध्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे या बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.