सासवड -पुरंदर तालुक्यातील भिवडी गावात मुंबई येथून सात व्यक्तींचे एक कुटुंब आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज या कुटुंबातील व्यक्तींना गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व ग्रामीण भागांमध्ये शाळांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी पुरंदर तालुक्यातील भिवडी गावामध्ये मुंबई येथून सात व्यक्तींचे कुटुंब आले असल्याचे प्रशासनास समजले. मुंबई येथील वातावरण खराब झाल्याने ते गावी आल्याचे सांगण्यात आले परंतु सध्या पुरंदर तालुका करोना मुक्त असल्याने या व्यक्तींना पाहून नागरिकांत घबराटीचे वातावरण झाले आहे.
या कुटुंबाची गावातील प्राथमिक शाळेमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी या कुटुंबातील व्यक्तींवर गुन्हा दाखल केलेला आहे. या कुटुंबापासून कोणताही संसर्ग होणार नाही याची प्रशासनाकडून पूर्णतः दक्षता घेण्यात आलेली आहे.
त्यामुळे भिवडी येथील सर्व ग्रामस्थ व तालुक्यातील इतर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, विषाणू संसर्गाच्या संकटांमध्ये आपापल्या घरी राहून व सोशल डिस्टंस पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.