नवी दिल्ली – देशात सन 2021 साली जनगणना हाती घेतली जाणार आहे. हे मोठे काम असून त्या कामाची रूपरेषा ठरवण्यासाठी गृहमंत्रालयातील वरीष्ट अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याचा आढावा घेतला गेला. गेले दोन दिवस या विषयाची एक परिषद सुरू होती. त्यात राज्य सरकारांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. जनगणना कामाच्या संबंधातील शंकांचे निरसन करण्याचे काम यावेळी करण्यात आले. एनआरसीच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
यंदाची जनगणना ही पारंपारीक पेन आणि कागदावरील नोंदीनुसार केली जाणार नाही तर मोबाईल फोन ऍपच्या सहाय्याने केली जाणार आहे. या जनगणनेसाठी 1 मार्च 2021 ही बेस लाईन धरली जाणार आहे. तथापि बर्फवृष्टी होणाऱ्या हिमाचलप्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांसाठी ही बेसलाईन किंवा रेफरन्स डेट 1 ऑक्टोबर 2020 अशी असणार आहे.
ही जनगणना नेमकी कशी केली जाणार आहे आणि त्यातून कोणकोणती माहिती संकलीत केली जाणार आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या साठी जे मोबाईल ऍप वापरले जाणार आहे त्याचे प्रात्यक्षिकही यावेळी घडवण्यात आले. जनगणनाकामासाठी एक स्वतंत्र विभाग सर्वच पातळ्यांवर कार्यरत असणार आहे या विभागाच्या रचनेसंबंधातहीं यावेळी माहिती देण्यात आली. राज्यांनी या कामात आपले योगदान देणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यांनी नेमकी काय सिद्धता ठेवायची आहे यावरही या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.