कराड – भारतीय जनता पक्षाचे येथील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते राजाभाऊ देशपांडे यांचे आज दुपारच्या सुमारास येथील श्री हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका निष्ठावंत पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी वयाची शंभरी गाठली होती.
गोविंद विनायक देशपांडे उर्फ राजाभाऊ देशपांडे यांनी या परिसरात भारतीय जनता पक्ष उभा करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतले. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात हे शिवधनुष्य त्यांनी वेळप्रसंगी स्वतःचा पैसा अडका खर्च करून पेलण्याचा निरपेक्षपणे निष्ठेने प्रयत्न केला. ते स्वतः वैचारिक आणि लढवय्ये नेते होते. त्यांच्या निष्ठेबद्दल त्यांचे राजकीय विरोधक देखील अभिमानाने बोलताना नेहमीच दिसले.
कराड नगरपरिषदेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून काही काळ प्रतिनिधित्व केले. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती तर त्यावेळच्या कराड लोकसभा मतदारसंघातूंन देखील त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून भाजप घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न केले.
कराडचा भाजप म्हणजे राजाभाऊ असे समीकरणच बनले होते. त्यांच्या जाण्याने एका निष्ठावंत पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजाभाऊ देशपांडे यांची त्यांच्या येथील राहत्या घरी जाऊन नुकतीच भेट घेतली होती.