मुंबई : राममंदिराबाबत गेल्या काही आठवड्यात बोलघेवडे बोलत आहेत. ते येतात कोठून हेच समजत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केल्यानंतर भाजप सेना युती संपुष्टात आल्याची भावना राजकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांत भाजपाने शिवसेनेला थांबवलेला प्रतिसाद ही त्या दिशेनेच जाणीवपूर्वक केलेली खेळी असल्याचे मानले जाते.
भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या काही दिवसातील हालचाली आणि घोषणा या स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. महाजनादेश यात्रेत राजापूर येथे बोलताना नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. नाणार प्रकल्प हटाव ही शिवसेना नेत्यांनी कळीचा मुद्दा बनवला होता. त्या मुद्द्यातील हवाच मुख्यमंत्र्यांनी काढून घेतली.
कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत शिवसेनेचे कडवे विरोधक नारायं राणे यांनी केले. त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शिवसेने मुखपत्र असणार्या सामनातून त्यावर कानपिचक्या देण्यात आल्या होत्या. राजांना आता शिस्त लागेल, अशी मल्लिीनाथी करण्यात आली होती. मेगाभरतीवरही शरसंधान करण्यात आले होते.
शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षात असल्यासारखी वागत होती. अर्थात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची स्पेस हा पक्ष भरून काढत असल्याने भाजपाला ते सोयीचेच होते. त्याचवेळी सेना भाजपावर मात करणार नाही याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली. नाशिक येथील समारंंभाआधी भाजपानेते किरीट सोमय्या यांनी भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार येईल, असे विधान केले. त्यावेळी खोदून खोदून विचारूनही शिवसेनेचा नामोल्लेख टाळला. मात्र, त्याचवेळी गिरिश महाजन मात्र युती होईलच. गेले महिनाभर मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त असल्याने युती चर्चा होत असल्याचे सांगत होते.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील नेत्यांचे झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्वबळावर सत्ता मिळवण्याची खात्री भारतीय जनता पक्षाला झाली आहे. त्यामुळे युती तोडायचे जनतेला सांगायच्या कारणाचा शोध या पक्षाकडून घेतला जात आहे. तसेच हा निरोप कोणामार्फत उध्दव टाकरे यांच्याकडे पोहोचवायचा याचीही चाचपणी केली जात आहे.