भाजपने सूड उगवल्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची टीका
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील घरातील पोलिस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. ही राजकीय विद्वेषातून करण्यात आलेली कृती आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. पक्षाच्या नेत्यांना अशा कृत्याद्वारे दबावात घेण्याचा किंवा त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाहीं अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातील लढा सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांना माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे सदस्य या नात्याने वाय दर्जाची सुरक्षा दिल्लीत पुरवण्यात आली होती.
दिल्लीत पवारांचे सहा जनपथ हे निवासस्थान आहे. तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या 20 तारखेपासून बंगल्यावरील रिपोर्टिंग थांबवले आहे. तथापी ही सुरक्षा काढून घेण्यापुर्वी सरकारने पवारांना कोणतीही पुर्व कल्पना दिलेली नाही.हा केवळ राजकीय बदल्याच्या भावनेतून करण्यात आलेला प्रकार असून त्यातून कोणी दबेल अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रकरणी भाजपवर टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने त्यांच्या हातून हे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता त्यांच्या हातून गेल्याने गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपने हा विषय मनाला लाऊन घेतला आहे आणि त्यातून ते सुडाच्या भावनेतून असा निर्णय घेत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या संयुक्तीआघाडीचे सरकार स्थापन करण्यात पवारांनी पुढाकार घेतला होता. त्याचा राग भाजपच्या मनात असल्याची टीकाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.