कराड -कराड नगरपालिकेने इंदोरच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या चौकात सेल्फी पॉईंटची निर्मिती केली आहे. मात्र, पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने या पॉईंटच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या कोल्हापूर नाका येथील “आय लव्ह कराड’ हा सेल्फीपॉईंट उड्डाण पुलाखाली राहणाऱ्या लोकांच्या विळख्यात सापडला आहे.
कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाअंतर्गत शहराच्या सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेऊन येथील कोल्हापूर नाका, शाहूचौक, प्रशासकीय इमारत परिसर, कृष्णानाका परिसर आदी ठिकाणी सेल्फीपॉईट उभारले आहेत. यासाठी लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, सेल्फीपॉईंट उभारणी केल्यानंतर त्यांची देखभाल दुरूस्ती तसेच सुरक्षिततेच्या जबाबदारीकडे कराड नगरपालिकेची आहे. असे असतानाही पालिकेने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर नाका परिसरात शहराच्या प्रवेशव्दारावर “आय लव्ह कराड’ हा सेल्फीपॉईंट उभारला आहे. मात्र, याच परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली गेल्या काही महिन्यांपासून एका समाजातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुले या सेल्फी पॉईंटच्या बगिच्यात तसेच “आय लव्ह कराड’ अशी बसवण्यात आलेल्या इंग्रजी अक्षरांवर खेळत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
ही बाब नागरिकांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, सेल्फीपॉईट असो व त्या लहान मुलांची सुरक्षा असो याकडे पालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील अन्य सेल्फी पॉईंटच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाचेही दुर्लक्ष…
कराड शहराच्या प्रवेशव्दारावर तसेच समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाखाली गेल्या काही महिन्यांपासून एका विशिष्ट समाजातील काही कुटुुंबाचे वास्तव्य आहे. या समाजातील कुटुंबांसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, ती कुटुंबे त्याठिकाणी जात नाहीत.
त्यांचा तळ कोल्हापूर नाका परिसरात राहिल्याने महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. अनेकवेळा त्यांची लहान मुले तसेच प्रौढ लोकही महामार्गावर बसलेले असतात. तर लहान मुले मार्गावरच झोपलेली दिसून येतात. त्यांच्यावर ना पोलीस अंकुश ना अन्य कोणत्याही प्रशासनाचा अंकुश. त्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला आहे.