शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात गेल्या वर्षी दिड महिना रस्ता पाण्यात जाऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले असल्याचा अनुभव पाठीशी असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरात कोणतीच कार्यवाही केली नाही. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-नगर महामार्गावरील खड्डे पूर्ववत झाल्याने व रस्ता पूर्णत: पाण्यात गेल्याने दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटर रांगा लागल्या. बांधकाम विभागाचे आतातरी डोळे उघडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गावर गेल्या वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यास बांधकाम विभागास अपयश आल्याने वाहतूक कोंडीला प्रवासी व वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते. आणि आता यंदा पहिल्याच मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावर आले.अनेक छोटी वाहने बंद पडत असल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षभरात वेळ असूनही व रस्त्याचे टेंडर होऊनही काम का केले नाही. असा सवाल उपस्थित होत आहे. लॉक डाऊनच्या काळात रस्त्याच्या दुतर्फा गटारांचीही कामे का केली नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.
आजच्या पावसामुळे पुण्यातून कोरेगाव तसेच शिक्रापूरला पोहोचण्यास अनेकांना तासन्तास कोंडीत अडकावे लागले. अर्धा तास अंतराच्या रस्त्यास तीन ते चार तास तिष्ठत थांबावे लागले. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस व पोलीस मित्र करीत होते.