मुंबई – वरळी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून विधान परिषदेचे तिकीट निश्चित मानले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. आता विधानसभा सदस्य एक जागा रिकामी होत आहे. यामुळे शिवसेनेकडून शिंदेच विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना सूत्रांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि मिलिंद नार्वेकर, राहुल कनाल आणि सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत होती. मात्र, या जागेसाठी सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.
महापालिका स्वराज्य संस्थामधून शिवसेनेचे एक आमदार विधानपरिषदेवर पाठवला जातो. या जागी रामदास कदम यांना 2016 साली पाठवले होते. मात्र शिवसेना नेते रामदास कदम यांना पुन्हा विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे समजते.
दरम्यान, रामदास कदम यांची मध्यंतरी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुरावे दिल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर कदम यांचा विधानपरिषदेतून पत्ता कट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच शिवसेनेतून तरुण नेत्याला विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.