पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शुल्क न भरल्यामुळे काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्रवेशपत्र अर्थात हाॅलतिकीट देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या दोन तक्रारी समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुल्क भरले नाही, म्हणून विद्यार्थ्यांचे हाॅल तिकीट रोखता येणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, प्रवेशपत्र न देणाऱ्या संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले.
दहावीच्या विद्यार्थ्याने शुल्क न भरल्यामुळे शाळेने त्यांचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते. त्यामुळे पुण्यातील एका शाळेत मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. त्यावरुन पुण्यासारख्या शहरात केवळ शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बस न देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या सर्व प्रकारानंतर राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बारावीच्या परीक्षा देण्यापासून एकाही विद्यार्थ्याला वंचित ठेवता येणार नाही. तसेच शुल्क भरले नाही, म्हणून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट रोखता येणार नाही. प्रवेशपत्र देण्यास टाळाटाळ केल्याच्या दोन तक्रारी आल्या आहेत. संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देणे अपेक्षित आहेत. मात्र, एखादी शाळा विद्यार्थ्याला परीक्षेपासून वंचित ठेवत असेल तर संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल.
गुणदान प्रक्रिया ऑनलाइन
यंदा पहिल्यांदाच प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे प्रचलित पद्धतीच्या तुलनेत ऑनलाइन प्रणालीमुळे काम अधिक वेगाने होणार आहे. त्याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही होऊ शकतो. त्यामुळे मे अखेरीपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थिती आवश्यक
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता, दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे. वेळ सुरू झाल्यावर प्रवेश दिला जाणार नाही, असे गोसावी यांनी सांगितले.
यंदा खासगी विद्यार्थीसंख्येत वाढ
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा साडेपाच हजारांनी वाढली आहे. त्याशिवाय पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्यावर्षी ३४ हजार १ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यंदा ही संख्या ३९ हजार ५८७ झाली आहे.
तर पुनर्परीक्षार्थीही चार हजारांनी वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत खासगी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सोळा हजारांनी वाढली आहे. दरम्यान, पुढील दोन वर्षांत नवीन अभ्यासक्रम लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या अभ्यासक्रमानुसारच उत्तीर्ण होता येण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असू शकतात. त्यामुळे खासगीरित्या परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढण्यामागे हे कारण असू शकते, असे बोर्डाचे म्हणणे आहे.