शिक्रापूर,(वार्ताहर) –येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सध्या शाळकरी मुलांना ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी नसल्याने शाळकरी मुलांना चक्क महामार्गालगत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मधल्या सुट्टीमध्ये मुले पाणी पिण्यासाठी शाळेच्या बाहेर पुणे नगर महामार्गालगत असलेल्या हॉटेल, दुकान किंवा मिळेल त्या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे दिसून येत आहे; मात्र पिण्याच्या पाण्यासाठी शाळकरी मुलांची होणारी भटकंती धोकायादक आहे. शाळकरी मुलांसाठी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले संतोष शेंडे हे पाण्याचे काही जार शाळेमध्ये पुरवत आहेत. शाळेबाहेरील व्यावसायिक विशाल सांडभोर व विशाल खेडकर हे दोघे देखील मुलांना दुकानाबाहेर पिण्यासाठी पाणी ठेवत आहे.
मात्र शाळकरी मुलांची पाणी पिण्यासाठी होणारी भटकंती चिंताजनक असताना शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी निवडणूक व मतदान प्रक्रिया राबवणारे पुढारी, नागरिक व ग्रामस्थ गेले कोठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळा प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मुलांच्या पाण्याची समस्या सोडवून मुलांची होणारी भटकंती थांबवण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.
सध्या शाळेमध्ये बोअरला पाणी फार कमी असून पाणी उपलब्ध होत नाही. शाळेतील पाणी फिल्टर बंद पडलेला असल्यामुळे मुलांना पिण्याच्या पाण्याची अडचण आलेली आहे.-रतन मंडलिक, मुख्याध्यापिका
शिक्रापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या अडचण बाबत ग्रामपंचायतकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेतील पिण्याच्या पाण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली जाईल. -शिवाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी