पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात निर्माण झालेले संकट लक्षात घेता त्यावर जोरदार प्रहार करण्याचा निर्धार सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. त्यासाठी घरी राहून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मला काय होणार आहे असा विचार करून घराबाहेर पडण्याऐवजी आपल्यामुळे आपल्या कुटूंबियांना किंवा देशबांधंवाना या आजाराचा संसर्ग होणार नाही, याची दक्षता प्रत्येकानेच घेतली पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सायली सांभारे-राजहंस यांनी केले आहे.
“दै. प्रभात’ आणि “डिजिटल प्रभात’शी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. सायली म्हणाल्या, करोनाचे संकट सध्या देशभरात आहे. शालेय पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत देश आणि देशबांधवांविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. ही प्रतिज्ञा केवळ पुस्तकापुरती मर्यादित राहायला नको. करोनाचे संकट पाहता या काळात आपल्याला देशाविषयीचे प्रेम दाखवुन देण्याची वेळ आली आहे. तुम्ही सुरक्षित राहिला तर तुमचे कुटुंबिय सुरक्षित राहील. तुम्ही घराबाहेर पडला नाही तर आपोआपच तुम्ही सुरक्षित राहाल. पर्यायाने, तुमच्यामुळे अन्य व्यक्तीलाही त्याचा संसर्ग होणार नाही.