सेंच्युरियन – अवघ्या ३६ दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेत ३१ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकूण इतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
लक्षवेधी
– पहिल्या कसोटीसाठी भारतीय खेळाडूंचा कसून सराव
– विश्वकरंडकाच्या पराभवातून खेळाडू आता सावरलेत- द्रविड
– दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बामुआकडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक
– आफ्रिका भूमिवर पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या बॉक्सिंग डे कसोटी मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही नववी कसोटी मालिका असेल, परंतु आतापर्यंत या देशात भारत एकही मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सध्याची मालिकाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक आव्हान असणार आहे व त्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी तयारीत कुठलीही कसर न सोडता रविवारपासूनच मैदानावर कसून सरावास सुरुवात केली आहे.
एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत रोहित शर्माला कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याशी बरोबरी साधण्याची संधी होती पण अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे तो विश्वविजेता कर्णधार होऊ शकला नाही. आता त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार होण्याची संधी आहे आणि अर्थात तो ती दवडू इच्छित नाही.
मोहम्मद अझरुद्दीन (१९९२), सचिन तेंडुलकर (१९९६) आणि सौरव गांगुली (२००१) यांच्या नेतृत्वाखाली भारत दक्षिण आफ्रिकेत अपयशी ठरला. राहुल द्रविड (२००६-०७), धोनी (२०१०-११ आणि २०१३-१४) आणि विराट कोहली (२०१८-१९ आणि २०२१-२२) यांनी कसोटी सामने जिंकले पण कोणत्याही संघाने मालिका जिंकली नाही.
अशात भारताच्या काही स्टार क्रिकेटपटूंसाठी हा दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा दौरा असू शकतो आणि तो निश्चितच संस्मरणीय बनवण्यासाठी ते उत्सुक असतील. दुसरीकडे, टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेकडे काही चांगले वेगवान गोलंदाज आहेत जे भारताच्या युवा फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. सलामीवीर यशस्वी जैस्वालची खरी कसोटी कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सन आणि जेराल्ड कोएत्झी या गोलंदाजांसमोर असेल.
कर्णधार या नात्याने भारताला दक्षिण आफ्रिकेत पूर्वी जे यश मिळवता आले नाही ते साध्य मिळवून द्यायचे आहे. असे असले तरी मी सामन्याच्या परिणामांवर आत्तापासूनच जास्त विचार न करता फक्त खेळाचा आनंद घेणार आहे. यासह सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजाविणाऱ्या के.एल राहुलकडूनही मला अपेक्षा आहे.
– रोहित शर्मा, कर्णधार, भारत
त्याचप्रमाणे उपखंडातील खेळपट्ट्यांवर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसारख्या फलंदाजांना अधिक आव्हानात्मक परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल ही अय्यरची कमजोरी मानली जात आहे आणि त्यावर मात करण्यासाठी त्याला काहीतरी खास करावे लागेल. मात्र जेस्वाल व गिल यांना शैलीत बदल न करता परिस्थितीनुसार फलंदाजी करावी अशी इच्छा प्रशिक्षक द्रविड यांनी बोलून दाखवली आहे.
संभाव्य संघ :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, कीगन पीटरसन, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स (यष्टीरक्षक), नांद्रे बर्गर, मार्को जॅन्सन, विआन मुल्डर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, डेव्हिड बेडिंगहॅम.
आतापर्यंतचा विक्रम असा
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकूण २३ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताला केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. येथे त्याने १२ सामने गमावले असून ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. या आकडेवारीवरून कळते की, दक्षिण आफ्रिकेत कसोटी जिंकणे टीम इंडियासाठी नेहमीच किती कठीण गेले आहे.
बाॅक्सिंग-डेवर पावसाचे सावट!
बाँक्सिंग डेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरला सेंच्युरियनमध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय वादळासह जोरदार वारे वाहतील. तथापि, कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हवामानाची स्थिती थोडी चांगली असू शकते, असा अंदाज स्थानिक हवामान खात्याने वर्तविला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मात्र्र पावसाची शक्यता नाही, पण आकाश ढगाळ राहील, असेही हवामान विभागाने पुढे म्हटले आहे.