पुणे – महापालिकेकडून शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात येत आहे. 18 मेपासून महापालिकेकडून ही उपाययोजना राबविण्यात येत असून, त्यामुळे गेल्या महिन्याभरात पाव टीएमसी पाण्याची बचत झाली आहे. परिणामी, यंदा जून महिना संपत आला तरी मागील वर्षीच्या तुलनेत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत एक टीएमसी जादा पाणी शिल्लक आहे. 22 जून अखेर खडकवासला धरणसाखळीत 4.32 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 3.16 टीएमसी होता.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने, शहरात पाणी कपात वाढविण्याची गरज भासणार नसल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू असून, 30 जूनपर्यंत पावसाची वाट पाहून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
पावसावर पालिकेचे गणित
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत धरणात एक टीएमसी जादा पाणी असले तरी पालिकेने पुढील आठवड्यात हवामान विभागाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने पाण्याचे नियोजन या पावसावर ठेवले आहे. मागील वर्षी 1 जुलै रोजी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांत 2. 86 टीएमसी पाणासाठा असल्याने महापालिकेने शहरात 2 जुलैपासून दिवसाआड पाणी पुरवठ्याची घोषणा केली. या घोषणेच्या दिवशीच पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने अवघ्या आठवडाभरातच हा पाणीसाठा नऊ टीएमसीच्या वर गेल्याने महापालिकेने दिवसाआड पाण्याचे नियोजन रद्द केले.
तर जुलै अखेरीस हा पाणीसाठा तब्बल 20 टीएमसीपर्यंत गेला होता. यंदाही महापालिकेस तशीच अपेक्षा आहे.
- खडकवासला धरण साखळीतील पाणी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश.
- त्यानुसार महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त बैठकीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय.
18 मे पासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी. - मात्र त्यानंतर प्रशासनाकडून सातत्याने नियोजन करून पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी.
- परिणामी महिन्याभरात 0.25 ते 0.30 टीएमसी पाण्याची बचत.
- सध्या धरणात असलेले पाणी महापालिकेस नियोजनानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत पुरविता येणार.