फलटण -लाखो वैष्णवांसह पंढरीला निघालेल्या माउलींच्या सोहळ्याने शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते यांनी सोहळ्याचे स्वागत केले. तत्पूर्वी, सातारा जिल्हावासीयांनी माउलींना भावपूर्ण निरोप दिला. जिल्ह्यातील बरड येथील शेवटच्या मुक्कामानंतर सोहळा सकाळी 6.30 वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ झाला. त्या आधी पहाटे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माउलींची पूजा व आरती करण्यात आली. सोहळाप्रमुख ऍड. विकास ढगे-पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक उपस्थित होते.
ढगाळ, आल्हाददायक हवामानात सोहळा सकाळी 8.45 वाजता साधुबुवाचा ओढा येथे पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी पोहोचला. साधुबुवा हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत होते. वारीच्या वाटेवर राजुरी येथील ओढ्यावर त्यांनी आपला देह ठेवला होता. तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. दरवर्षी माउलींची पालखी साधुबुवांच्या मंदिरात नेण्यात येते. परंपरेप्रमाणे माउलींच्या पादुका साधुबुवांच्या समाधीवर ठेवण्यात आल्या. तेथे ऍड. संपतराव कुंभारगावकर यांनी या ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायातील पहिल्या ओवीवर प्रवचन केले. सकाळच्या न्याहरीनंतर सोहळा धर्मपुरीकडे मार्गस्थ झाला.
सोलापूर जिल्ह्यात उत्साही स्वागत
माउलींच्या अश्वांनी सकाळी 10.15 वाजता आणि लाखो वैष्णवांसह माउलींच्या रथाने 10.45 वाजता धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे प्रवेश सोलापूर जिल्ह्यात केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, अधिकारी व मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. बरड-नातेपुते या वाटचालीत शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाचा डोंगर लागतो. महादेवाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जातात आणि शिंगणापूर फाटा येथे सोहळ्यात पुन्हा सहभागी होतात. यावेळी दिंड्यादिंड्यांमधून शंभूमहादेवाची महती सांगणारे अभंग गायिले जात होते. वारकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आकाशात ढगांची गर्दी व्हायची, पण पाऊस पडला नाही. त्यामुळे पंढरी समीप येऊनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाऐवजी चिंता दिसत होती. शिंगणापूर फाटा येथे सायंकाळच्या विसाव्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. नातेपुते हद्दीत सायंकाळी 5.30 वाजता मान्यवर आणि नागरिकांनी सोहळ्याचे स्वागत केले. सोहळा सायंकाळी 6 वाजता पालखीतळावर पोहोचला. तेथे समाजआरती झाल्यानंतर सोहळा मुक्कामी विसावला.
भाविक अनुभवणार रिंगणांची पर्वणी
श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्यात रिंगणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर (पुरंदावडे हद्द), खुडूस फाटा, ठाकुरबुवा (उघडेवाडी) आणि पंढरपूर तालुक्यातील बाजीराव विहीर (वाखरी) येथे गोल रिंगण होते. बाजीराव विहीर (वाखरी) व इसबावी (पंढरपूर) येथे दोन उभी रिंगणे होतात. या रिंगण सोहळ्याला लाखो भाविक गर्दी करतात.