-अरुण गोखले
आपली संस्कृती आपल्याला स्वार्थी अन् संकुचित विचार करायला शिकवत नाही. तर मी, तू आणि आपण सर्वजण, अवघे मानव बांधव इतका व्यापक व्हावा हेच आपल्या संस्कृतीला अभिप्रेत आहे. हीच आपल्याला थोर संस्कृतीची शिकवण आहे.
ज्यावेळी एखाद्या मोठ्या विचाराने, शिकवणीने, बोधाने अनेकांना आणि तेही एकाच वेळी खऱ्या अर्थाने जागवायचे असते, मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधन करायचे असते, त्या वेळी सत्संगाचे माध्यम वापरले जाते. असे सत्संग हे कीर्तन महोत्सव, प्रवचनांचे कार्यक्रम, सामुदायिक ग्रंथ पारायणे, भजन महोत्सव या सारख्या निमित्ताने केले जातात.
सत्संगाचा अर्थच असा की, जे चांगले आहे, उदात्त आणि लोकाभिमुख आहे. ज्याला स्वार्थाची दुर्गंधी नाही तर नि:स्वार्थीपणाचा सुगंध आहे. ज्या आचार विचाराने समाज एकत्र येईल, एका विचाराने, कल्पनेने, जाणिवेने बांधला जाईल आणि ज्यामधून अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी काही तरी विधायक कृती घडेल, तोच खरा सत्संग.
अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व वयोगटातील लोक एकत्र येतात. येथे ज्याप्रमाणे भोळेभाबडे भक्तभाविक गोळा होतात तसेच विद्वान, ज्ञानी, पंडित, अभ्यासक आणि उपासकही गोळा होतात. अशा कार्यक्रमाच्या माध्यमाने श्रोत्यांना मोठमोठ्या विद्वान मंडळींचे विचार ऐकण्याची एक सुवर्ण संधी मिळत असते. त्यांची शिकवण आणि प्रबोधनपर भाषणे प्रेरणा देतात.
भागवत सांप्रदायातर्फे आयोजित केले जाणारे कीर्तन, भजन महोत्सव, सामाजिक संस्थांमार्फत आयोजित केली जाणारी व्याख्याने, ही सर्व एका वैचारीक सामाजिक परिवर्तनाच्या उदात्त हेतूनेच आयोजित केली जातात. कारण प्रचंड मोठ्या समाजा समोर एखादी गोष्ट, विचार, संकल्पना ही एकाचवेळी त्या व्यासपीठावरून मांडता येणे सोपे जाते. एकाचवेळी अनेकांच्या अंतरंगाशी आपलेपणाचा सुखसंवाद साधता येतो. त्यातून सद्विचार, सत्प्रवृत्ती, सदाचरण, भक्ती जागविता येते. मोठ्या प्रमाणात काही सामाजिक उपक्रमांसाठी पुढे येण्याचे लोकांना आवाहनही करता येते. मानवी मनातील सहृदयता, माणुसकी, प्रेमाला साद घालता येते.
अशा कार्यक्रमांच्या आयोजनातूनच गरजू समाजासाठी मदत उभी करणे, अर्थसहाय्य गोळा करणे, रक्तदानासारखे पवित्र दान करण्यास लोकांना उद्युक्त करणे, अशा गोष्टी केल्या जातात. यांस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. सत्संग ही सध्याच्या काळाची गरज आहे.