टाकळीभान – संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याने मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने टाकळीभान येथे सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट (कुणबी) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथून आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. अनेक वेळेस उपोषणे करून तसेच वारंवार सरकारला इशारे देऊनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक पाऊले उचलत नव्हती. शेवटी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली “चलो मुंबई” चा इशारा देण्यात आला.
लाखोंच्या संख्येने मराठा समाज घराबाहेर पडला. २६ जानेवारी रोजी मराठा समाजाने मुंबईत शिरकाव केल्याने सरकारला नमते घ्यावे लागले. अखेर संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याचे जरांगे यांचेकडून सांगण्यात आले. मराठा समाजाचा आजचा दिवस हा विजयी दिवस ठरला आहे. टाकळीभान येथे स्टॅंड परिसरात सकल मराठा समाज वग्रामस्थांनी डोली बाजाच्या गजरात, फटाके फोडत, गुलालाची उधळण करून एकमेकांना पेढे भरवत विजय उत्सव साजरा केला.