सातारा – राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवक घडले आहेत. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून मिळालेले संस्कार भविष्यातील दूरदृष्टी ठेवून आपल्या अंगी जपावेत. तसेच ग्रामीण भागातील संस्कार, रुढी, परंपरा ही शिदोरी घेऊन वाटचाल करावी हाच राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक डॉ. सुधीर इंगळे यांनी व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अपशिंगे (मिलिटरी) येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरातील कार्यक्रमप्रसंगी डॉ. इंगळे बोलत होते. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे संचालक सुनील निकम म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी घडतात तसेच संस्कारसंपन्न, व्यसनमुक्त, जबाबदारीची जाणीव असलेला युवक घडवण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत आहे.
कार्यक्रमास अपशिंगेचे सरपंच तुषार निकम, सिनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. रामराजे माने- देशमुख, माजी शिक्षणाधिकारी यशवंत निकम, संपत निकम, प्रा. राजेंद्र तांबिले, प्रा. सुभाष पाटील उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. नवनाथ इप्पर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गणेश लोहार यांनी आभार मानले.