सातारा (प्रतिनिधी) – सातारा नगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या विलासपूरमधील गणेशनगर, राधिका कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी परिसरातील पाणीपुरवठा चार दिवसांपासून विस्कळीत झाला होता. याबाबत जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने परिसरातील नागरिकांनी थेट नगराध्यक्ष सौ. माधवी कदम आणि पाणी पुरवठा समिती सभापती सीता हादगे यांच्याकडे तक्रार केली.
नागरिकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगराध्यक्षांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली.
पालिकेची हद्दवाढ झाली असली तरी नव्याने समाविष्ट झालेला भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. या अडचणी मांडल्यास नगरपालिका व शासकीय यंत्रणा दाद देत नाही, असा अनुभव गेले चार दिवस विलासपूरमधील नागरिक घेत होते.
पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी करूनही जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे विलासपूरमधील राधिकानगर, फॉरेस्ट कॉलनी, गणेशनगर येथील नागरिकांनी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेविका धनश्री महाडिक यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.
महाडिक यांनी माधवी कदम व सीता हादगे यांची भेट घेऊन नागरिकांमध्ये असलेल्या असंतोषाची माहिती दिली. नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केल्यावर कदम यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू करायला सांगितले. माजी सरपंच बाळासाहेब पिसाळ, अभय जगताप, जीवन प्राधिकरणचे अभियंता स्वप्निल जाधव, पालिकेचे संदीप सावंत, नंदकुमार कांबळे, सुदाम घाडगे उपस्थित होते.