पुसेगाव – महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील लाखो बैलगाडा शर्यत शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री सेवागिरी यात्रोत्सवातील ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’ बैलगाडा शर्यतीला पुसेगावमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यामध्ये साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत फुलोर द्वारलीकरांचा महान भारत केसरी ‘हरण्या’ आणि बाबुशेठ माने घरनिकी आणि एम. जे. ज्वेलर्स यांचा ‘राजा’ या बैलजोडीने पहिल्या क्रमांकाचे एक लाख 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंकून ‘श्री सेवागिरी हिंदकेसरी’चा किताब पटकवला.
दहिवडी रोड, बैल बाजाराजवळील मैदानात सकाळी 7 वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या उपस्थितीत ‘लाइव्ह ऑन कॅमेरा’ चिठ्ठी पद्धतीने लॉटस् पाडले गेले. सकाळी आठ वाजता मानाचा नारळ फोडून पहिला फेरा सुरू झाला.
शर्यतीसाठी एक हजार विक्रमी गाड्यांची नोंद झाली. कमिटीच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे एक दिवसात फायनल झाली. अचूक निकाल पाहण्यासाठी ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरे तैनात करण्यात आले होते. शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून शर्यती झाल्या.
दुसर्या क्रमांकापासून विजयी गाडामालकांची नावे पुढीलप्रमाणे – श्री सेवागिरी प्रसन्न, विजय मेडिकल (पुसेगाव), महालक्ष्मी प्रसन्न, स्वप्निलराजे दीपकशेठ साखरे (मुरूम), ज्योतिबा प्रसन्न, तनिष्का सागरराजे घाडगे (मुरुम), सुमित दत्तात्रय जाधव (पुसेगाव), सेवागिरी प्रसन्न, आम्रपाली बाळासाहेब शिंदे (पुसेगाव), सचिनशेठ चव्हाण (वाई), मोरया प्रसन्न (मोरगाव), आई तुळजाभवानी प्रसन्न (चरेगाव), निसर्ग गार्डन (कात्रज), सेवागिरी प्रसन्न, कैवल्य शंकर घाडगे (पुसेगाव).
पुसेगावात बैलांना पळण्यासाठी आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी नंदनवन असेल, असे मैदान तयार केले होते. मैदानात एकापेक्षा एक जातिवंत खिल्लार आणि म्हैसूर क्रॉस जातीच्या वेगवान बैलांच्या शर्यतीचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. प्रत्येक फेरा चुरशीचा होऊन स्पर्धा उत्कंठावर्धक झाली. ही तीन राऊंड बैलगाडा शर्यत होती.
गटाचे 100 फेरे व सेमीफायनलच्या दहा फेर्या झाल्या. मैदानात उत्कृष्ट धावपट्ट्या, बॅरिकेडस्, प्रेक्षक गॅलरी, ड्रोन कॅमेरे, लाइव्ह कॅमेरे, मोठे स्क्रीन, थेट प्रक्षेपण, जनावरांना चारापाणी, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, पारदर्शक निकाल आणि आरोग्यविषयक सोयिसुविधा केल्याने बैलगाडा मालक आणि शौकिनांनी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामस्थांचे कौतुक केले.