कराड -कराड दक्षिण मतदारसंघातील पवारवाडी-नांदगाव येथील पाझर तलाव वाढवण्याची गरज आहे. यामुळे भागातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकेल. त्यामुळे वाढीव पाझर तलावासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पवारवाडी-नांदगाव येथील वनहद्दीत 1972 साली बांधण्यात आलेल्या अत्यंत महत्वाच्या पाझर तलावाची पाहणी कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास चार किलोमीटर शेतातील खडतर वाटेने प्रवास करून वनविभाग व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दौरा केला. ड्रोनच्या माध्यमातून तलावाच्या संपूर्ण रचनेची माहिती घेऊन तलावाची उंची वाढवणे, जुनी भिंत पूर्णपणे काढून नवीन भिंत बांधण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर येताना त्याच शिवारात असलेल्या पुरातन श्री बिरोबा देवाचे मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, प्रा. धनाजी काटकर, माजी जि.प. सदस्य निवास थोरात, कराड दक्षिण कॉंग्रेस उपाध्यक्ष नितीन थोरात, जखिनवाडीचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, कराड दक्षिण कॉंग्रेस सरचिटणीस उदय पाटील, सेवादल अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नांदगावचे उपसरपंच अधिकराव पाटील, बाळासाहेब पाटील, टि.के पाटील, पोलीस पाटील दिलीप पवार, पवारवाडीचे उपसरपंच विनायक पवार, दिनकर पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश पाटील, संजय पाटील, अधिकराव पाटील, व शेतकरी, ग्रामस्थ, धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण मतदारसंघातील डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु, ते पाणी थांबत नाही. योग्य ती साठवणूक न केल्याने दुष्काळात त्याची जाणीव होते. यामुळे काही गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे केला जातो. 1972 च्या दुष्काळात दहा मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात आला. त्याऐवजी आणखी उंच म्हणजे 13 ते 14 मीटर उंचीचा बंधारा बांधला. तर 50-60 टक्के अधिकचा पाणीसाठा होऊ शकेल. या बंधाऱ्यातून पाझरणारे पाणी थांबवून, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने बंधारा बांधल्यास साठलेले पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटू शकेल.
नवीन विस्तारित तलाव केल्यास 25 एकर वनखात्याची जमीन पाण्याखाली जाणार असून त्यास निर्वनिकरण करावे लागेल. जितकी जमीन पाण्यासाठी जाईल, तितकीच जमीन झाडे लावण्यासाठी देवून त्याचा खर्चही द्यावा लागेल. नवीन बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक काही दिवसात तयार केले जाईल. याबाबत माझी वन व जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. वनतळ्याबाबत नियम शिथिल करण्याची गरज आहे. नांदगावच्या पाझर तलावाचा विस्तार होऊन मोठा पाणीसाठा होईल, अशी परिस्थिती दिसत आहे. याबाबत पाठपुरावा राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.