सातारा – जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलाचा या वर्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सध्या कास पुष्प पठारावर मिकी माऊस या पिवळ्या फुलांचा बहार पाहयला मिळत आहे. या पठाराला 15 ऑक्टोबरपर्यंत सुमारे एक लाख पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
कास पुष्प पठारावर रंगीबेरंगी विविध प्रजातीची फुले उमलण्यास ऑगस्टनंतर सुरुवात होते. दरवर्षी 1 सप्टेंबर रोजी कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाला सुरुवात होते. साधारण एक ते दीड महिना हा हंगाम चालतो. यावर्षी सात वर्षानंतर पठारावर उमललेली टोपली, कारवी ही फुले पर्यटकांची आकर्षण ठरली. या पठारावर सध्या केवळ मिकी माऊसची फुले दिसत आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने कास पठारावर कार्यकारी समितीने येथील ऑनलाइन बुकिंग बंद केले आहे.
ऑफलाईन बुकिंग सुरू राहणार असून फुलांचा हंगाम अजून वीस दिवस चालेल असे सांगण्यात आले. अद्यापही अनेक पर्यटक कास पठारावरील फुले पाहण्यासाठी येत आहेत. यंदा पठारावरील संरक्षक जाळी काढून टाकण्यात आल्यामुळे परागिकरणाला चालना मिळाली आहे. त्याचाच परिणाम फुलांचे विविध प्रकार वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र, ठराविक ठिकाणी तंगुसची जाळी लावून काही मार्ग अडवण्यात आले आहेत. हंगामाच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यांतच वीस हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. पितृ पंधरवडा संपल्यावर कासच्या पर्यटन हंगामाने उचल खाल्ली आणि यंदाच्या हंगामाने लाख पर्यटकांचा टप्पा ओलांडला.
कास पुष्प पठाराबरोबरच येथील इतर प्रजातीची फुले व कुमुदिनी तलाव पाहून पर्यटक आनंद घेत आहेत. पठार कार्यकारी समितीने सुरू केलेली जंगल सफारी देखील पर्यटकांना अनुभवता येणार आहे. येथे तयार करण्यात आलेले छोटे मोठे पॉंईट देखील पर्यटकांसाठी खुले आहेत.
ई-बसची जाणवतेय उणीव
सातारा शहरानजीकच्या कास पुष्प पठारावर राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने ई- बस सेवा सुरू केली होती. मात्र, राज्यात खात्यांची खांदेपालट झाल्यानंतर तत्कालीन पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ई- बस योजना तूर्त तरी बारगळली आहे.
सातारा एसटी आगाराच्या मध्यवर्ती भागामध्ये ई चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजित केले आहे. यासाठी 50 लाखाची निविदा मागवण्यात आली आहे. आगाराने 18 ई शिवाई बसची मागणी परिवहन महामंडळाच्या राज्य व्यवस्थापकांकडे केली आहे. चार्जिंग स्टेशनची सोय उपलब्ध होणार असल्याने पुन्हा पुढील काळाच्या फुलोत्सव हंगामासाठी ई बस उपलब्ध होतील अशी पर्यटकांना आशा आहे.