सातारा- जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई बंधार्यांची निर्मिती होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी व ग्रामपंचायत विभागाने पुढाकार घेतला आहे. दि. 29 व 30 नोव्हेंबर गावोगावी ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे व कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
वनराई बंधारे बांधण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. याबाबत विभाग व गावनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागासाठी प्रति गाव 5 कामांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. किमान 2 हजार 850 एवढे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यांत दुष्काळी परिस्थितीचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.29) आणि गुरुवारी (दि.30) गावोगावी ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. ग्रामस्थ, जिल्हा परिषद व खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कंपनी, उद्योग, सहकारी संस्था आणि कारखाने यांचा सीएसआर आदींचा सहभाग घेऊन या दोन दिवशी जास्तीत जास्त वनराई बंधार्यांची कामे घ्यावीत, असे आवाहन अर्चना वाघमळे व विजय माईनकर यांनी केले आहे.